गुप्तचर विभागामार्फत घटनांची चौकशी करा
परभणी,दि.14(समाजहित न्यूज वृत्तांत) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा परिसरातील भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीच्या काचेच्या तोडफोड प्रकरणाचा केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतेवेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या भारतीय संविधानाचा अवमान सहन केला जाणार नाही, संविधान मानणार्यांनाच भारतात राहण्याचा अधिकार आहे. ज्यांना संविधान मान्य नसेल त्याने देश सोडावा, असे नमूद केले. व परभणीत घडलेल्या संपुर्ण घटनेची गुप्तचर विभागामार्फत कसून चौकशी करावी, अशी मागणीही केली.
केंद्रीय मंत्री आठवले यांनी शनिवारी (दि.14) दुपारी परभणी दाखल झाल्याबरोबर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. त्या पाठोपाठ शासकीय विश्रामगृहावर आठवले यांनी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, प्रभारी पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकार्यांना पाचारण करीत आढावा घेतला. त्या पाठोपाठ पत्रकार परिषदेतून पत्रकारांशी हितगुज केले. यावेळी बाबूराव कदम, ब्रम्हानंद चव्हाण, दिलीप जोशी, किशोर थोरात, बाळकृष्ण एंगडे, डॉ.सिध्दार्थ भालेराव, डी.एन.दाभाडे, जिल्हाध्यक्ष डॉ.विजय गायकवाड यांची उपस्थिती होती.
डॉ. आंबेडकर यांनी मोठ्या कष्टाने संविधान बनवले आहे. त्याद्वारे अखंड भारताची संकल्पना मांडली आहे. परभणीत काचेमध्ये ठेवलेल्या त्या प्रतिकृतीचे नुकसान करून सोपान पवार नावाच्या आरोपीने संविधानाचा अवमान करण्याचा प्रयत्न केला आहे, असे नमूद करीत आठवले यांनी हा प्रकार सहन न झाल्याने कार्यकर्ते व महिलांच्या भावना उफाळून आल्या. त्यातून आंदोलन केल्या गेले, असे म्हटले. या प्रकरणात त्या आरोपीविरोधात अॅट्रासिटीसह इतर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झालेले आहेत. आरोपीवर नांदेड येथील रूग्णालयात उपचार सुरु आहेत, तेथून सुटी मिळाल्यावर आरोपीची गुप्तचर विभागामार्फत चौकशी केली पाहिजे. या घटनेमागे आणखी कुणाचा हात आहे का? हे देखील तपासले पाहिजे, असे ते म्हणाले. वत्सलाबाई मानवते या महिलेस पोलिसांनी जबर मारहाण केल्याचेही नमूद करीत आठवले यांनी ती महिला अत्यवस्थ असल्याचे सांगितले. या प्रकरणी संबंधितांची चौकशी करून कारवाई व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.
पोलिसांनी 300 लोकांविरूध्द गुन्हे दाखल केले आहेत. एक ट्रक, बसेस व इतर खाजगी गाड्या, 2 पोलीस व्हॅनची तोडफोड झाली आहे. 18 दुचाकी वाहनांचेही मोठे नुकसान झाले आहे. यात सिसिटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी अटक केलेल्या 42 जणांना अटक केली असून त्या पैकी 10 जणांना जामीन मिळाला आहे, असे आठवले यांनी पत्रकारांना सांगितले. निरपराधांना, विद्यार्थ्यांना यात अडकवू नका. ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत ते गुन्हे मागे घेण्याची विनंती आपण स्वत: मुख्यमंत्र्यांना भेटून करणार असल्याचेही ते म्हणाले.

